तभा वृत्तसेवा
आर्णी,
Water crisis on Arnikar people : प्रत्येकाला किमान ५५ लिटर तरी शुद्ध पाणी द्यावे हे सरकारचे धोरण आहे. मात्र, आर्णी नगर परिषदेच्या नियोजनशून्य कारभारामुळे आर्णीकरांवर सध्या जलसंकटाचे सावट पसरले आहे. एप्रिल महिन्यातच पाणीप्रश्न गंभीर झाला असून महिना उलटूनही नळ कनेक्शन बंद असल्याचे विदारक चित्र दिसत आहे.
उन्हाळा लागून दोन महिने उलटले. मात्र, पाणीप्रश्नावर आर्णी नप गंभीर नाही. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. शहरातील काही भागांमध्ये पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनचे काम सुरू आहे. नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी शहरातील पक्के सिमेंट रस्ते फोडून पाईप टाकल्या जात आहेत. मात्र नवीन पाईप टाकताना जुनी पाईपलाईन फोडण्यात येत आहे. जुन्या पाईपवर कित्येक नागरिकांचे नळ कनेक्शन असून ते मोठ्या प्रमाणात फुटले आहेत.
याबाबत मोमीनपुरा भागातील काही नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत. मात्र प्रशासनाचे काही पाणीपुरवठा कर्मचारी वेळकाढूपणा करून उद्या दुरुस्त करून देतो म्हणून मागील एका महिन्यापासून नागरिकांना झुलवत आहेत.
ऐन उन्हाळ्यात सर्वसामान्य नागरिकांना पिण्याच्या पाण्यासह घरात वापरण्यासाठी पाणी टँकरद्वारे विकत घ्यावे लागत आहे. नप प्रशासनाने या गंभीर बाबीकडे वेळीच लक्ष देऊन मोमीनपुरा भागातील जुने नळ कनेक्शन त्वरित चालू करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
..तर मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन
उन्हाळ्यात दरवर्षी आम्हाला पाण्यासाठी भटकंती करावी लागते. एक महिन्यापासून घरातील नळाला पाण्याचा थेंब नाही. नवीन पाईप टाकण्यासाठी झालेल्या खोदकामामुळे माझे नळ कनेक्शन बंद केले. ते सुरू करण्यासाठी नपकडे वारंवार विनवणी केली. परंतु महिना उलटूनही चालढकलपणा केला जात आहे. येत्या दोन दिवसांत नळ कनेक्शन न दिल्यास आम्ही मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन करू, अशी प्रतिक्रिया मोमिनपुèयातील नागरिक हाकीम शेख यांनी दिली.