तभा वृत्तसेवा
गोदिया,
महाराष्ट्र राज्य आंगनवाडी बालवाडी कर्मचारी (Anganwadi workers) संघटना व हिंद मजूर सभेच्या आव्हानावर आज, 20 फेब्रुवारपासून अंगणवाडी व बालवाडी कर्मचारी संपावर गेल्या आहेत.
संपावर जाण्यापूर्वी जिल्हा परिषद कार्यालयासमोर निदर्शने करुन सरकारचे आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले. यावेळी आयटकचे राज्य उपाध्यक्ष हौसलाल रहागंडाले, आम्रकला डोंगरे, जीवनकला वैद्य, ज्योती डोंगरे, प्रणिता रंगारी, सरिता मांडवकर, उर्मिला खोब्रागडे, मंगला शहारे, विना गौतम, राजलक्ष्मी हरिणखेडे, ज्योती लिल्हारे, सुनिता मंलगाम, बिरजूला तिडके, आदींनी मोर्च्याला मार्गदर्शन केले. अंगणवाडीसेविका, सहायिका, मिनि कर्मचार्यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी, नियमित पेंशन लागू करण्यात यावे, थकीत रक्कम त्वरीत देण्यात यावी, मराठीमध्ये पोषण आहार टॅकर सुरु करुन नवीन मोबाईल देण्यात यावा, अंगणवाडी कर्मचार्यांना शासकीय कर्मचारीचा दर्जा देण्यात यावा आदी मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरिता हे आंदोलन करण्यात येत आहे.