अदानीचा मुद्दा टाळण्यासाठी सरकार संसद चालू देत नाही

    दिनांक :16-Mar-2023
Total Views |
- मल्लिकार्जुन खडगे यांचा आरोप
 
नवी दिल्ली, 
अदानीचा मुद्दा टाळण्यासाठी तसेच स्वतःचे अपयश लपवण्यासाठी सरकार संसद चालू न देण्यासाठी विरोधकांना चिथावणी देत असल्याचा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष Mallikarjun Kharge मल्लिकार्जुन खडगे यांनी गुरुवारी केला. राहुल गांधी यांनी ब्रिटनमध्ये केलेल्या वक्तव्यावर माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, याचा पुनरुच्चार खडगे यांनी केला. राहुल गांधी यांनी ब्रिटनच्या दौर्‍यादरम्यान केलेल्या वक्तव्यावरून संसदेत प्रचंड गोंधळ सुरू आहे. अर्थसंकल्पीय सत्राचा दुसरा टप्पा सुरू झाल्यापासून पहिल्या तीन दिवसांत दोन्ही सदनांमध्ये कोणतेही महत्त्वाचे काम झालेले नाही.
 
 
Mallikarjun Kharge
 
अस्पृश्यता आहे की नाही, ती आहे म्हणून कुणी विदेशात गेले तर ती व्यक्ती त्याबद्दल बोलेलच. त्याचप्रमाणे लोकशाही पायदळी तुडवली जात आहे. बुधवारी आम्ही शांततेत निदर्शने करीत होतो, आम्हाला कुणी रोखले? त्यांनी आमच्यासमोर महिला पोलिस शिपायांंना बसवून आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला, असा आरोप खडगे यांनी केला. सरकार अदानीचा मुद्दा टाळण्याचा प्रयत्न करीत आहे. त्या माध्यमातून त्यावर चर्चा होऊ नये, सरकारच्या अपयशावर संसदेत चर्चा होऊ नये, असा सरकारचा प्रयत्न आहे. सत्ताधारी पक्ष दररोज संसदेतील कामकाज ठप्प पाडत असल्याचे कधी तुम्ही ऐकले का, कामकाज सुरू होताच ते उभे राहून ‘माफी मांगो’ ‘माफी मांगो’, अशा घोषणा सुरू करतात, हा काय प्रकार आहे? सरकार स्वत: चिथावणी देते आणि इतरांना लोकशाहीचा उपदेश करते, असे Mallikarjun Kharge खडगे यांनी सांगितले.