तभा वृत्तसेवा
राळेगाव,
राळेगाव तालुक्यातील एकाच आठवड्यात तीन शेतकर्यांचे जीव गेले. (MLA Ashok Uike) यात राळेगाव तालुक्यातील तेजनी येथील शेतकरी पुत्र भूपेश गुलाब पालकर यांनी विहिरीत आत्महत्या केली. तर टाकळी येथील शेतकरी विठ्ठल कुळसंगे शेतात काम करत असताना त्यांचा शेतातील वीजखांबाच्या अर्थिंगला करंट लागून जागीच मृत्यू झाला.
विशेष म्हणजे, मृतक विठ्ठल कुळसंगे यांनी चार दिवसांअगोदर वायरमनला तोंडी स्वरूपात, माझ्या शेतात खांबाला करंट येत आहे, असे सांगितले होते. याकडे वायरमनने त्वरित लक्ष दिले असते तर विठ्ठल कुळसंगे यांचा जीव वाचला असता असे गावकरी सांगत होते.
तर सावनेर येथील स्वप्नील विनायक आत्राम हे शेतातून घरी आल्यावर बाथरूममध्ये गेले असता लोखंडी दरवाजात करंट असल्याने स्वप्नीलने दरवाजाला हात लावताच शॉक लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. या सर्व मृतकांच्या कुटुंबियांची राळेगावचे आमदार तथा माजी आदिवासी विकास मंत्री (MLA Ashok Uike) डॉ. अशोक उईके यांनी भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष चित्तरंजन कोल्हे, संदीप तेलंगे, दिनेश गोहणे यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.