ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांचे राज्यांतील दौरे ही केवळ नौटंकी असून, मुख्यमंत्री असतानाही कोकणातील जनतेच्या तोंडाला त्यांनी पाने पुसली होती. पक्ष आणि आमदारही गमावलेल्यांकडे आता फक्त व्यक्तिद्वेषाची भाषणे शिल्लक आहेत. रोज सकाळी उठून बोलण्याचा संजय राऊतांचा वारसा आता उद्धव ठाकरेंनी स्वीकारला असल्याची टीका महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री Radhakrishna Vikhe Patil राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
विखे पाटील यांनी लोणी येथे आपल्या जनसंपर्क कार्यालयात जनता दरबाराच्या निमित्ताने नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांचे प्रश्न जाणून घेतले. यापूर्वी सुद्धा उद्धव ठाकरे यांनी कोकणाचे दौरे केले; परंतु तेथील जनतेला ते काही देऊ शकले नाहीत. आताही ते व्यक्तिद्वेषाच्याच भाषणांपलीकडे काहीही देऊ शकणार नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी वाढलेला पक्ष उद्धव ठाकरे यांनी केव्हाच गमावला. त्यांच्या पक्षाचे आमदारही त्यांना सोडून गेले, असा टोला मंत्री विखे पाटील यांनी लगावला. देशामध्ये इंडिया आघाडीकडे नेतृत्व करायला एकही नेता आता शिल्लक नाही. प्रत्येक जण वेगळी भूमिका घेऊन इंडिया आघाडीतून बाहेर पडू लागला आहे. इंडिया आघाडीने कितीही प्रयत्न केले तरी, देशातील जनतेने नरेंद्र मोदी याना पंतप्रधान करण्याचा निर्णय घेतला आहे., असे Radhakrishna Vikhe Patil विखे पाटील म्हणाले.