संत प्रबोधन
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या भूमीमध्ये अनेक संत व संप्रदाय यांनी भक्ती संस्काराची तेजोमय पताका आजतागायत फडकवत ठेवली आहे. संतांनी जी प्रबोधनाची परंपरा समाजाला दिली, त्या परंपरेचे पाईक होण्याचे भाग्य अनेक संतांना लाभलेले आहे. संत ज्ञानेश्वर माउली यांनी या प्रबोधन परंपरेचा पाया घातला तर तुकोबाराय तिचे कळस झाले. याच परंपरेत असंख्य संतांनी आपली भक्ती वचने फुलवली आहेत. संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज यांनी तर प्रबोधन परंपरेला अधिक प्रवाही करण्याचं काम केलं.
ज्ञानदेवे रचिला पाया । उभारीले देवालया ॥
नामा तयाचा किंकर । जेणे केला हा विस्तार ॥
नाथ दिला खांब । तोचि मुख्य आधार ॥
तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ॥
या संत परंपरेतील एक संत म्हणजे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात मलकापूर तालुक्यातील माकनेर या लहानशा गावातून ज्यांनी आपली भक्तिगंगा निर्माण केली, ते ब्रह्मरूप संत श्री Saint Maruti Maharaj Maknerkar मारुती महाराज माकनेरकर होत. त्यांचं प्रबोधन कार्य अलौकिक आहे. असंख्य अभंग, कीर्तन, गीताभाष्य, सुभाषित निर्माण करून त्यांनी आचाराचा सिद्धांत आपल्या भक्त परिवाराला दिला. त्यांच्या एकूणच साहित्यावर आजतागायत अनेक अभ्यासकांनी पीएच.डी. प्राप्त केली. असंख्य भक्तांना त्यांची भजन पाठ आहेत. त्यांची वचने मुखोद्गत आहेत.
ब्रह्मरूप संत श्री मारुती महाराज माकनेरकर
Saint Maruti Maharaj Maknerkar श्री मारुती महाराज माकनेरकर यांचे जीवन व कार्य अतिशय भक्तिपूर्ण आहे. आत्मतत्त्व आणि भक्ती मार्गाची शिकवण देणारे हे संत कोणत्या पद्धतीने आपले कार्य करतात. मारुती महाराजांची आध्यात्मिक वाटचाल, त्यांचे बालपण व शिक्षण, महाराजांचे शिष्य संप्रदाय याबद्दल माहिती त्यांच्या विविध ग्रंथातून पाहायला मिळते. जीवनामध्ये ब्रह्मप्राप्ती करायचे असेल, तर सद्गुरुप्राप्ती हाच त्याचा उपाय आहे, असे ते प्रकर्षाने सांगतात. परमार्थासाठी देहबुद्धी सोडावी लागेल आणि मगच तुम्हाला परमार्थाची प्राप्ती होईल, हे महाराजांचे आगळेवेगळे विचार लेखातून संत महाराजांचे विचार मांडतात. कोणतीही गोष्ट प्राप्त करायची असेल तर -
असाध्य ते साध्य । करिता सायास ॥
कारण अभ्यास । तुका म्हणे ॥
या वचनाप्रमाणे आपल्याला त्या भक्तीचा ध्यास धरावा लागेल, असं मत महाराज या ठिकाणी मांडतात. त्यासाठी भक्तीचा एकविद्भाव तुमच्या अंत:करणांमध्ये असला पाहिजे. तुम्ही जाणीव ठेवून कर्म करू नका तर अंतरी जाणीव नसावी, हा भाव भक्तिमार्गामध्ये खूप महत्त्वाचा ठरतो. खरा देव भेटायचं असेल तर..
तीर्थी धोंडा पाणी । देव रोकडा सज्जनी ॥
हे तत्त्व आपण अंगीकारले पाहिजे, असे ‘तीर्थी धोंडा पाणी’ या विचारातून आपलं भक्ती वचन मांडतात. जोपर्यंत ब्रह्मदृष्टी प्राप्त होत नाही, तोपर्यंत ही मायासृष्टी आपल्यावर राज्य करीत असते, हा तत्त्व विचार मोठ्या ताकदीने मारुती महाराज मांडतात. व्यक्तीची आध्यात्मिक प्रगती आणि अधोगती हे कोणत्या पद्धतीने होते ते लक्षात घ्यावे, असा भाव ते सांगतात.
धनसंपत्तीचा मोह तो सोडावा ।
नको येऊ देऊ स्वामी आडभावा ॥
भक्तिमार्गामध्ये सेवेला खूप महत्त्व आहे. वेदांताचा सिद्धांत सांगतो. ‘सेवा परमो धर्म:।’ त्याच उक्तीनुसार संत मारुती महाराज माकनेरकर सांगतात -
नको धन मोक्ष मुक्ती ती ही काही ॥
संत संग देई मज सदा ॥
तुमच्या दासाचा दास करून ठेवा ॥
आशीर्वाद हाची द्यावा मज ॥
‘जाणीव नसावी अंतरी भावे सेवा करी’ असा ज्याचा भाव असेल त्याला भगवंत साक्षात भेट देत असतो. साधनभक्ती अशा जाणिवेतून करतात. इतक्या माळा जपल्या, इतक्या वार्या केल्या, प्रत्येक जण हिशोब ठेवतात. एखाद्या ठिकाणी देणगी दिली आणि ते सांगत सुटावे, अशा व्यक्तींना जाणिवेचे भक्तिकर्म कळलेच नाही. त्यातून फक्त अहंकार वाढतो.
संत तुकाराम महाराज म्हणतात की -
अहंकाराचा वारा । न लागे राजसा ॥
संतांचा विचार पुढे जावा संतांचे हे कार्य लेखनरूपी धन प्रत्येकाच्या हातात द्यावं. ज्याप्रमाणे ‘तीर्थी धोंडा पाणी । देव रोकडा सज्जनी ॥’
Saint Maruti Maharaj Maknerkar
भगवंत हा सज्जन व्यक्तीमध्येच वास करतो.
महाराजांच्या उक्तीप्रमाणे-
नका पाहू वेद पुराण । पाहे अंतर शोधून ॥
मारुती म्हणे अंतकरण । ओळख नरदेही दर्पण ॥
खरा शिष्य कोण असेल, तर जो मनाने भाविक आहे, जो कोणाची कुचेष्टा करत नाही, जो सद्वर्तनी आहे. त्याची आणि भाविकाची लक्षणे या ग्रंथातून लेखकाने खरा शिष्य भाविक विचार बोधातून उद्धृत केलेले आहेत.
खरा शिष्य भाविक । त्यासी नावडे लौकिक ॥
सद्गुरू वचने देई प्राण । पूर्ण हे इमान ॥
आणि जो खरा भाविक भक्त असतो, त्याला जोपर्यंत ब्रह्मदृष्टी प्राप्त होत नाही, तोपर्यंत त्याला माया सृष्टीही दिसतच असते. भक्ताने कसे वागावे, तर जीवनातील मोहमाया टाकूनच सद्गुरू शरण जावे. ज्या पद्धतीची जीवनसंहिता आपल्याला समजून दिलेली आहे, त्या पद्धतीचं क्रियमान आपण केलं पाहिजे. भगवंताची व्यापकता त्याशिवाय लक्षात येऊ शकत नाही. संत तुकारामांनी त्यांचे वर्णन केलेले आहे.
अणूरेणूया थोकडा । तुका आकाशाएवढा ॥
अन्यथा आध्यात्मिक अधोगतीच्या मार्गाची द्वारे अशा भक्तांना काम, क्रोधाधी विकार निर्माण झाल्यामुळे खुली होत असतात. ती विषयाच्या चिंतनातून निर्माण होते, अशी भगवद्गीता सांगते -
ध्यायतो विषयान्पुस: । सड्गात्सजायते सुप जायते ॥
विषयाचे चिंतन करणार्या पुरुषाची त्या विषयात आसक्ती उत्पन्न होते. तिथूनच विषयाची कामना निर्माण होते. कामना जर पूर्ण झाल्या नाहीत तर क्रोध उत्पन्न होतो. याच क्रोधातून पुढे विचारशक्ती नष्ट होऊन अविचार बळावतो. स्मरणशक्तीचा नाश होऊन स्मरणशक्ती भ्रष्ट होते. बुद्धीचा नाश म्हणजे ज्ञानशक्तीचा नाश होय. बुद्धीचा नाश झाला की माणसाचा अध:पात होतो. एवढे मोठे तत्त्वज्ञान संत मारुती महाराज अनेक ग्रंथांतून मांडतात. म्हणून कामनेला बाजूला सारून खरी भक्ती करावी, असा विचार संत मारुती महाराज मांडतात.
प्रेमाविण भजन । नाकावीन मोती । ।
अर्था वाचून पोथी । वाचून काय ॥
भक्ती उपासनेमध्ये भावाला खूप महत्त्व आहे.
जैसा ज्याचा भाव । तैसा त्याचा देव ॥
या उक्तीनुसार देव हा भावाचा भुकेला आहे. देवाला तुमचा पैसा नको, संपत्ती, पद, प्रतिष्ठा नको. तर, तुमची खरी भावाची भक्ती हवी. त्यासाठी अत्यंत आवडीने भगवंताच्या नामाचा स्मरण करावं.
आवडीने भावे हरिनाम घेसी ।
तुझी सर्व चिंता त्यासी आहे ॥
Saint Maruti Maharaj Maknerkar
जेव्हा एखाद्या व्यक्तीवर किंवा कुटुंबावर संतकृपा होते, तेव्हा त्याची आध्यात्मिक प्रगती होते. परंतु सुंदर, आज्ञाधारक बायको मिळणे, इमारत निर्माण होणे, लॉटरी लागणे, व्याधीतून सुटका होणे, शेतात चांगलं पीक येणे, व्यवसाय भरभराटीला जाणे या सर्व संसारिक सुखाच्या गोष्टी अध्यात्माशी जोडल्या जातात. परंतु, परमार्थिक प्रगती यापेक्षा वेगळी होय. खरं म्हणजे, भगवंताने माणसाचा देह देतानाच आनंद तत्त्व शरीरामध्ये जन्मताच दिलेले आहे. परंतु मनुष्य काम, विकार आणि संसारिक दुःखामुळे सदैव दु:खी राहतो.
मारुती म्हणे करा घाई । आनंद आणा संतापायी ॥
जीवन जगताना आनंद हा सांभाळता आला पाहिजे. तो संत मारुती महाराजांनी आपल्या भक्तगणांना आपल्या तत्त्वज्ञानातून सदैव दिलेला आहे.
संत तुकाराम महाराज म्हणतात -
आनंदाचे डोही आनंद तरंग । आनंदची अंग आनंदाचे ॥
स्वतःला ओळखण्याचे ज्ञान म्हणजेच आत्मज्ञान, संत मारुती महाराज माकनेरकर यांनी कसे सांगितले आहे, याबद्दल यथोचित भाष्य या लेखातून केले आहे. त्यासाठी सर्वाभूती ईश्वर मानला पाहिजे. हे जाणण्यासाठी संतांचे मार्गदर्शन आवश्यक आहे, म्हणून ते संतांचे उपकार कधीही विसरत नाहीत.
काय सांगू आता संतांचे उपकार ।
मज निरंतर जागविती ॥
काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ।
ठेविता हा पायी जीव थोडा ॥
या संत तुकारामांच्या उक्तीप्रमाणे संतविचार नाम चिंतनाचा संदेश देतो. हा महत्त्वाचा दाखला लेखक या ग्रंथातून देतात. शब्द ज्ञानापेक्षा अनुभवजन्य ज्ञान कधीही श्रेष्ठ आहे.
अनुभव आले अंगा । ते या जगा देत असे ॥
या संतवचनाप्रमाणे आपण जीवनामध्ये वागावे असा मोलाचा सल्ला ते देतात. इंद्रिय जिंकणे महत्त्वाचे आहे.
इंद्रियाचा जय । वासनेचा क्षय ॥
संकल्पा वरी न ये मन । परिणामी देह द्यावा ॥
इंद्रियाचा विजय मिळवून आपला देह परिणामी द्यावा, असे आवाहन संत मारुती महाराज करतात.
ऐसा नामाचा महिमा । वेद शिणला झाली सीमा ॥
नामे तरीले अपार । महापापी दुराचार ॥
नाम साराचेही सार । शरणागत यम किंकर ॥
जीवन सार्थकी लावायचे असेल संत मारुती महाराजांच्या मते उपकार करावे आणि त्याची पुण्य परजन्मी भोगावे. मानवी जीवनामध्ये उपकार हा महत्त्वाचा आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात -
पुण्य परोपकार । पाप पर पीडा ॥
आपण जर परोपकार केला, तर आपल्याला भगवंत कृपादृष्टी दाखवतो. माणसाचा आत्मा हा प्रकृती अधीन आहे. मानवी जीव हा प्रकृती अधीन झाला, जीव हा आत्मरूप विसरला, त्यामुळे माणसाला स्वतःची ओळख राहत नाही. तो अज्ञानाच्या निद्रेमध्ये झोपला आहे. त्याला जागं करण्याचं काम संत करतात.
जीवनामध्ये सफल होण्याकरिता काही गोष्टींचा त्याग करावा लागतो, तर काही गोष्टी आचराव्या लागतात. संतांनी, ऋषिमुनींनी याबाबत योग्य मार्गदर्शन केलेले आहे. जीवनाच्या उत्थानाकरिता ज्या गोष्टी आवश्यक आहेत, त्या गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजेत. जीवनामध्ये ज्या गोष्टी टाकाऊ आहेत, त्या आपण सोडून दिल्या पाहिजेत, असा संत विचार लेखक या ठिकाणी सांगतात -
आशा टाकी क्रोध टाकी । टाकी मोहमाया ॥
शास्त्रवाद टाकी कर्म अभिमान ।
टाकी टाकी विद्या अभिमान ॥
या सर्व वाईट गोष्टी टाकून व्यक्तीने ज्ञानदृष्टी प्राप्त केली पाहिजे. जीवनात काय अंगीकारावे व काय त्यागावे, ही दिव्यदृष्टी संतकृपेमुळे प्राप्त होते.
मारुती म्हणे दिव्य डोळे । मिळती संतकृपा बळे ॥
प्रत्येक कार्य हे निर्धाराने, निश्चयाने पूर्ण होते. मग ते पारिवारिक कार्य असो किंवा सामाजिक असो, त्यामध्ये सफलता मिळावी, असे वाटत असेल तर निश्चय पक्का असावा लागतो. या दृढ निश्चयाची महती लेखक व्यक्त करतात.
निश्चयाचे बळ । तुका म्हणे तेची फळ ॥
संत मारुती महाराजांनी निश्चयाचे वर्णन केलेले आहे. भागवतप्राप्ती निश्चयाशिवाय नाही.
माझी निश्चयबुद्धी भली । संत भेटी दे पाहिली ॥
Saint Maruti Maharaj Maknerkar
मानवी जीवनाचा विकास साधण्यासाठी संतविचार महत्त्वाचा आहे. त्यासाठी आपले जे निहित क्रम आहे, ते आवश्यक करावे. गुणदोशी मन टाळावे आणि मनाकडून विश्वप्राप्ती साधावी. यासाठी संत मारुती महाराजांचा विचार सदैव स्पृहणीय वाटतो.
- प्रा. डॉ. हरिदास आखरे
7588566400