धर्म-संस्कृती
- प्रा. दिलीप जोशी
चार महिन्यांपूर्वी गुलबर्ग्याच्या सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ, सौंदर्यलहरीच्या साधक आणि तरुण भारतच्या नित्य वाचक डॉ. सौ. मेघा कमलापूरकर यांचा मला भ्रमणध्वनी त्यांनी माझा ‘तरुण भारत’मधील ‘श्रीललितासहस्रनामा’वरील लेख वाचून माझ्याशी संपर्क केला की, गुलबर्गा येथे आमचे मोठे सौंदर्यलहरी साधक मंडळ आहे. त्यांच्यासमोर आपण सौंदर्यलहरी मांडा. श्रीसूक्त, श्रीयंत्र, ललितासहस्रनामावर मी यथाबुद्धी बोलतो; पण 'Saundaryalahari' ‘सौंदर्यलहरी’ मात्र तितका अभ्यासलेला नाही.
अभ्यासेची प्रकट व्हावे, नाहीतर झाकोनी असावे|
प्रकट होवोनी नासावे, हे बरे नव्हे|
म्हणून मी विनम्र नकार दिला. डॉ. मेघाताईंनी मला 'Saundaryalahari' ‘सौंदर्यलहरी’ अभ्यासण्याची सूचना केली. त्यांचे सहज बोलणे हाच उपदेश समजून मी आज्ञापालन म्हणून सौंदर्यलहरी वाचण्यास घेतला. ‘सौंदर्यलहरी’ ही आदिशंकराचार्यांनी रचिलेली नितांतसुंदर, त्वरित फलदायी आणि प्रासादिक रचना आहे. सौंदर्यलहरी हे भगवती महात्रिपुरसुंदरी ललितांबिका अर्थात आद्या शक्तीच्या सौंदर्याचे वर्णन असून त्यात एकूण १०० श्लोक आहेत. हा त्रिगुणात्मिका जगदंबा, महात्रिपुर सुंदरीचा केवळ स्तुतिपाठ नसून प्रत्येक श्लोक हा स्वतंत्र मंत्र आहे. सध्याच्या भाषेत सांगायचे तर ‘सौंदर्यलहरी’ म्हणजे १०० मंत्रांचे मंत्रसंकुल आहे.
या मंत्रसंकुलातील प्रत्येक मंत्राची स्वतंत्र विद्या आहे, स्वतंत्र यंत्र आहे आणि प्रत्येक मंत्राचे स्वतंत्र तंत्र आहे. थोडक्यात, प्रत्येक श्लोकाचे स्वतंत्र अस्तित्व आहे. श्रीमद् भगवद् पूज्यपाद शंकराचार्यांनी आपल्याला दिलेले हे शतश्लोकी अद्भुत तंत्रविज्ञान किंवा तंत्रशास्त्र आहे. आपल्यासारख्या सामान्य माणसांनी हे भावभक्तीने आणि आर्तभावाने म्हणावे. तांत्रिकजनांनी यंत्र-मंत्र आणि तंत्रासह जबाबदारीने साधना करावी. ‘द्वयोरपि समं फलं!’ दोघांनाही अपेक्षित फळ मिळते.
सौंदर्यलहरी निर्मितीच्या संदर्भात विविध भेद आहेत. एका मतानुसार 'Saundaryalahari' सौंदर्यलहरी पूज्यपाद आदिशंकराचार्य अगदी शिशु अवस्थेत म्हणजे अवघे पाच असताना त्या महात्रिपुरसुंदरीच्या कृपाशीर्वादाने त्यांनी हे स्तुतिगायन रचिले. संत शिरोमणी नामदेवरायांच्या जीवनात भगवंतांनी प्रसाद खाल्ल्याची कथा आपणास ज्ञात आहे. नेमकी तशीच कथा पूज्यपाद शंकराचार्यांच्या जीवनात घडली. त्यांचे वडील बाहेरगावी गेल्यामुळे आदिशंकराचार्य जगदंबेला पायस प्रसाद घेऊन गेले. खूप वेळ झाला तरी भगवती पायस ग्रहण करत नाही पाहिल्यावर आदिशंकराचार्य अस्वस्थ झाले. त्या भवानीला आर्त हाक मारली. स्वतःचे डोके आपटायला सुरुवात केली. तेव्हा साक्षात जगदंबा प्रकट झाली. तिने पायस ग्रहण केले आणि अर्धा पायस प्रसाद आदिशंकराचार्यांना दिला. जगदंबेचा तो उच्छिष्ट प्रसाद ग्रहण करताच त्यांच्या मुखारविंदातून बाहेर पडलेले भगवतीचे सौंदर्य चित्रण म्हणजे ‘सौंदर्यलहरी’ होय.
दुसरे मत ज्योतिर्मठाचे विद्यमान शंकराचार्य पूज्यपाद अविमुक्तेश्वरानंद महाराजांच्या आदिशंकराचार्यांनी विविध मताचे जसे खंडण केले तसे शक्तीचेही खंडण केले. असेच परिभ्रमण करीत असताना ते तापाने आजारी पडले. त्यांना एका वैद्याने एक पुडी दिली आणि ती दह्यासोबत खाण्यास सांगितले. ते अशक्त असल्यामुळे त्यांना उठताही येईना. त्याच वेळी रस्त्यावरून एक दहीवाली जात होती. तिचा आवाज ऐकून त्यांनी तिला दही मागितल्यावर ‘इकडे रस्त्यावर येऊन दही घेऊन जा’ म्हटले. तेव्हा शंकराचार्य भगवान म्हणाले, ‘तिथपर्यंत येण्याचीही शक्ती नाही.’ तेव्हा ती दहीवाली म्हणाली की, ‘उठण्याची शक्ती नाही म्हणतो आणि शक्तीचे खंडण करतो.’ तेव्हा पूज्यपाद शंकराचार्यांना लक्षात आले की, दहीवाली नसून ही भगवती पराशक्ती आहे. तिला पाहताच त्यांच्या मुखातून १०० श्लोकी स्तोत्र बाहेर पडले; ‘सौंदर्यलहरी’ आहे.
तिसर्या कथेनुसार भगवद् पूज्यपाद आदिशंकराचार्य मानससरोवरावर असताना तपश्चर्येच्या योगाने भगवान महादेवांनी प्रसन्न होऊन त्यांना स्वयं शंभूंनी भवानीच्या सौंदर्याचे वर्णन केलेले १०० श्लोकी 'Saundaryalahari' ‘सौंदर्यलहरी’ स्तोत्र दिले. ते घेऊन जाताना वाटेत त्यातील अर्धे स्तोत्र भगवान नंदी यांनी फाडून घेतले. नंदीची तक्रार करण्यास ते महादेवाजवळ गेल्यावर त्यांनी जे आहे ते आणि पुढील श्लोकांची रचना तू कर. ते होते ४१ श्लोक. उर्वरित ५९ श्लोक आद्य शंकराचार्यांनी रचले.
भगवान शंकरांकडून मिळालेल्या ४१ श्लोकांना ‘आनंदलहरी’ तर शंकराचार्यांनी रचलेल्या ५९ श्लोकांना ‘सौंदर्यलहरी’ म्हणतात. ‘आनंदलहरी’ निर्गुण ब्रह्म उपासना तर ‘सौंदर्यलहरी’ सगुण ब्रह्म उपासना आहे. सगुण निर्गुण ब्रह्म उपासना मंत्र मिळून बनणार्या शतक मंत्रांना 'Saundaryalahari' ‘सौंदर्यलहरी’ जाते. दोन्हींमध्ये जगदंबेच्या सौंदर्याचे नितांतसुंदर वर्णन आहे. इथे सौंदर्य म्हणजे शृंगार नसून ते लेकराने केलेले आपल्या आईचे म्हणजे ललितांबिकेचे निखळ मातृसौंदर्य आहे. लहरी म्हणजे कंपन. त्या कधीच नष्ट होत नाहीत. उलट त्या लहरींचा सर्वत्र संचार असतो. अजून एका प्रघाताप्रमाणे सौंदर्यलहरीची उकल मेरू पर्वतावर भगवान गणेश किंवा पुष्पदंत यांनी केल्याबाबत आहे. विस्तारभयाने त्याचे वर्णन टाळतो. सौंदर्यलहरीचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या इतर स्तोत्रात शेवटी वेगळी फलश्रुती असते. इथे मात्र प्रत्येक श्लोक हाच मंत्र असून त्या मंत्रातच फलश्रुती आहे. प्रत्येक श्लोकमंत्राची वेगळी आदिदेवता आहे. प्रत्येक श्लोकाचे वेगळे यंत्र आहे. मूळ श्रीविद्या आहेच, पण श्रीविद्येच्या विविध शाखा प्रत्येक श्लोक मंत्रात आहेत. १०० श्लोकांच्या सिद्धी आहेत. मंत्र किंवा मंत्रसमूह विविध चक्र म्हणजे यंत्र रचना किंवा स्वरूप दर्शविते आणि सोबतच बाला त्रिपुरसुंदरी भगवती श्रीश्री चक्रराजनिलया जगदंबा स्वरूपाचे लावण्यवर्णन यात आहे.
भगवतीच्या लक्षणवती अंगप्रत्यंगाचे अलौकिक वर्णन असलेल्या सौंदर्यलहरी स्तोत्रात बहिरंग आणि अंतरंग उपासना आहे. योगसाधकांना कुंडलिनी जागरण, शरीरातील मूलाधारादी विविध चक्र जागरण सुकर होणारे श्लोकमंत्र आहेत. आद्याशक्तीच्या दिव्य तेजानेच चराचर सृष्टी प्रकाशमान आहे. तिच्याच शक्तिप्रेरणेने ब्रह्मा-विष्णू-महेश आपापली कार्ये सुचारू रूपाने करू शकतात. 'Saundaryalahari' ‘सौंदर्यलहरी’ हे त्या आद्यशक्ती असलेल्या मूळमाया आणि शस्त्र विद्येचे तात्त्विक, यौगिक आणि प्राकृतिक सगुण रूपाचे रसगर्भित, भक्तिपूर्वक आणि मनोहर असे वर्णन आहे. कर्ममार्ग, ज्ञानमार्ग आणि भक्तिमार्गाचा समन्वय असलेले तंत्रशास्त्र म्हणजे ‘सौंदर्यलहरी’ होय. तंत्रशास्त्र असले, तरी आपल्यासारख्या सामान्य माणसांना निखळ अंतःकरणाने अर्चन केल्यास हे ज्ञान गूढ असले तरी गम्य आहे.
- ९८२२२६२७३५