प्रासंगिक
- राहुल गोखले
Lokmanya and Swatantra Veer : लोकमान्य टिळकांचा उद्या १ ऑगस्ट रोजी आहे. लोकमान्यांचा भारताच्या जनमानसावर विलक्षण पगडा आहे. त्यांच्या देहावसानाला १०४ वर्षे होत असतानाही ते ‘गारुड’ अद्याप कायम आहे. याचे कारण लोकमान्यांचे जीवनच अलौकिक असे होते. यंदाचे वर्ष हे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुक्ततेचे शताब्दी वर्ष आहे. त्यामुळे लोकमान्य आणि स्वातंत्र्यवीर यांच्या एका अर्थाने गुरू-शिष्य नात्याचा मागोवा घेणे ठरावे.
Lokmanya and Swatantra Veer : स्वातंत्र्यवीर सावरकरांची अंदमानच्या कारागृहातून १९२१ च्या मे महिन्यात सुटका झाली. त्याच्या काही महिने अगोदर लोकमान्य टिळकांचे देहावसान झाले होते. १ ऑगस्ट १९२० रोजी टिळक निवर्तले. याचे वृत्त सावरकरांना अंदमानात समजले. ज्यांच्या युयुत्सु वृत्तीचा आदर्श नेहमी ठेवला होता त्या आपल्या लोकनेत्याचे निधन झाल्याचे वर्तमान ऐकून सावरकरांना अतीव दुःख झाले यात शंका नाही. भारतीय असंतोषाच्या जनकाच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी अंदमान कारागृहात सावरकरांसह बंद्यांनी उत्स्फूर्तपणे उपोषण केले होते. लोकमान्यांच्या जीवनाचा सर्वच क्रांतिकारकांवर मोठा पगडा होता. सावरकर आणि लोकमान्यांची प्रत्यक्ष भेट होऊन अनेक वर्षे लोटली असली, तरी लोकमान्यांचा त्यांच्यावरील प्रभाव कायम होता. लोकमान्यांच्या देहावसानानंतरही तो कायम राहिला. लोकमान्यांचा क्रांतिकारकांना आशीर्वाद होता. जाज्वल्य देशभक्ताला तो असणार, यात नवल नाही. सावरकरांची टिळकांवर एवढी श्रद्धा होती की, टिळक हे मुख्य प्रवाहातील नेते असल्याने आणि आणि पर्यायाने भूमिगत राहू शकत नसल्याने टिळक जे उघडपणे बोलू आणि करू शकत नाहीत, ते गुप्त क्रांतिकारी संघटनांनी केले पाहिजे, अशी सावरकरांची धारणा होती. सावरकर आणि त्यांच्या मित्रांनी मित्रमेळ्याची स्थापना केली ती त्याच ऊर्मीतून. टिळकांवर सावरकरांनी लहान वयात कविता रचली होती. पुण्यात शिक्षणासाठी आल्यानंतर सावरकरांना टिळकांचा सहवास आणि मार्गदर्शन मिळाले. १९०२ साली सावरकर पुण्यात आले आणि टिळक, शिवरामपंत परांजपे यांच्याशी त्यांच्या भेटी होऊ लागल्या. सावरकर तरुण नेते म्हणून उदयास येत होते आणि सावरकरांच्या मनातील ती तळमळ टिळकांनी हेरली त्यामुळेच सावरकरांनी केलेल्या उपक्रमांना टिळकांनी नेहमीच प्रोत्साहन दिले.
Lokmanya and Swatantra Veer : बंगालच्या फाळणीला टिळकांचा विरोध होता. फाळणीचा विरोध करण्यासाठी आंदोलन करण्याच्या योजनेत सावरकरांनी परदेशी कपड्यांची होळी करण्याची योजना मांडली. ती सभा झाली तेव्हा टिळक पुण्यात नव्हते; मात्र ते परतल्यानंतर सावरकरांनी त्यांच्यासमोर ती योजना मांडली आणि टिळकांना ती कल्पना पसंत पडली; पण एक त्यांनी घातली. ती म्हणजे होळी करण्यासाठी थोडेथोडके नव्हे तर मोठ्या प्रमाणावर कपडे गोळा करायला हवेत. प्रत्यक्ष होळीसाठी जी मिरवणूक निघाली तेव्हा लोकमान्य टिळकही त्यात सहभागी झाले आणि त्यांनी भाषणदेखील केले. याच होळीमुळे सावरकरांना फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहातून काढून टाकण्यात आले तेव्हा टिळकांनी केसरीत ‘हे आमचे गुरू नव्हेत’ हा जहाल अग्रलेख प्राचार्यांना फैलावर घेतले होते. पुढे सावरकरांनी ब्रिटनला जाऊन शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. श्यामजी कृष्ण वर्मा यांच्याकडून देण्यात येणार्या शिष्यवृत्तीसाठी त्यांनी अर्ज केला. त्याबरोबर सावरकरांनी दोन शिफारसपत्रे आवर्जून जोडली. एक होते शिवरामपंत परांजपे यांचे आणि दुसरे अर्थातच टिळकांचे. टिळकांनी पत्रात लिहिले होते, ‘हा तरुण (सावरकर) अत्यंत तडफदार असल्याचा माझा अनुभव सरकारी नोकरी कधीही करायची नाही, असा त्याचा निश्चय आहे आणि त्याचे नैतिक आचरण फार चांगले आहे.’ टिळक आणि परांजपे यांची शिफारसपत्रे असल्याने सावरकरांना शिष्यवृत्ती नाकारण्याचा प्रश्नच नव्हता. याचे कारण स्वतः वर्मा हेही टिळकांचे भक्त होते. टिळकांना १८९७ साली अटक झाल्यानंतर वर्मा यांनी भारत सोडून लंडनमध्ये कायमचे स्थायिक होण्याचा निर्णय होता. वर्मांनी शिष्यवृत्तीची पहिली खेप म्हणून ४०० रुपये टिळकांकडे पाठवून दिले. करारपत्रावर सह्या करण्यासाठी आणि शिष्यवृत्तीची रक्कम घेण्यासाठी सावरकरांनी आपल्या निवासस्थानी यावे म्हणून टिळकांनी सावरकरांना निरोप धाडला होता. १९०६ साली सावरकरांची लोकमान्यांशी झालेली ती भेट अखेरची ठरली.
इंग्लंडमध्ये शिक्षण घेत असतानाच मॅझिनीच्या चरित्राचा अनुवाद करून ते हस्तलिखित सावरकरांनी आपले बाबाराव यांना पाठवले. १९०७ साली प्रकाशित झालेला तो ग्रंथ लोकमान्यांना अर्पण करण्यात आला होता. काँग्रेसचे अधिवेशन नागपूरला झाले तर टिळक अध्यक्ष म्हणून निवडून येतील, या भयाने अधिवेशन नागपूरऐवजी सुरतला हलविण्यात आले. हेच ते गाजलेले १९०७ चे आणि मवाळ आणि जहाल यांच्यात फूट पडलेले अधिवेशन. मात्र, लंडनमध्ये असूनही सावरकरांचे स्वदेशात घडामोडींकडे बारीक लक्ष होते. टिळक हेच काँग्रेसचे अध्यक्ष निवडून यावेत आणि नागपूरला त्यास विरोध झाला तर तो उधळून लावावा, असे सावरकरांनी पत्रातून बाबारावांना कळविले होते. अर्थात पुढे अधिवेशन सुरतला झाले. बाबाराव तेथेही आपल्या तरुण सहकार्यांना घेऊन गेले होते. पुढे टिळकांची रवानगी मंडाले तुरुंगात झाली आणि सावरकरांची अंदमान तुरुंगात. तथापि, हालहवालाविषयी जाणून घेण्याची सावरकरांना तुरुंगात असतानाही उत्कंठा असायची. अंदमानात अगोदर सावरकरांना पत्र लिहिण्यास अनुमती नव्हती; मात्र १९१३ साली त्यांना ती मिळाली तेव्हा आपले बंधू नारायणराव सावरकरांना त्यांनी जे पत्र लिहिले त्यात अन्य काही विषयांबरोबर टिळकांची मुक्तता कधी होणार, हाही एक प्रश्न होता.
Lokmanya and Swatantra Veer : १९२० साली लोकमान्यांचे देहावसान झाले आणि त्यानंतर महिन्यांनी सावरकरांची अंदमानातून सुटका झाली. त्यामुळे लोकमान्य आणि सावरकर यांची जरी भेट झाली नाही तरी पुढच्या जीवनात लोकमान्यांचा मोठा प्रभाव सावरकरांवर राहिला. अंदमानातून सुटका झाल्यावर राजकारणात भाग न घेण्याच्या अटीवर सावरकरांची रवानगी रत्नागिरीला करण्यात आली. टिळकांनी समाजाच्या जागरणासाठी सार्वजनिक गणेशोत्सव अनेक वर्षांपूर्वी सुरू केला होता. रत्नागिरीत असताना सावरकरांनी त्याच अखिल हिंदू स्वरूप दिले. काँग्रेस अंतर्गतच लोकमान्यांनी १९२० साली लोकशाही स्वराज्य पक्षाची स्थापना केली होती. रत्नागिरीतील स्थानबद्धतेतून सुटका झाल्यावर सावरकरांनी सुरुवातीला त्याच लोकशाही स्वराज्य पक्षात प्रवेश केला आणि कालांतराने ते हिंदू महासभेला जाऊन मिळाले. लोकमान्यांच्या जन्मशताब्दी वर्षात पुण्यात स्थापन झालेल्या सर्वपक्षीय समितीने जन्मशताब्दी समारंभात मुख्य भाषण देण्यासाठी सावरकरांना निमंत्रितसावरकरांची लोकमान्यांवर निस्सीम भक्ती होती याचा प्रत्यय त्यांचे लेखन, भाषण आणि कृती यातून आल्याखेरीज राहत नाही.
- ९८२२८२८८१९