उबाठाकडून निव्वळ ढोंगबाजी

    दिनांक :31-Aug-2024
Total Views |
मुंबई वार्तापत्र
- नागेश दाचेवार
Uddhav Thackeray : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देशातील सर्वच संवैधानिक यंत्रणांचा वारंवार अपमान केला आहे. पंतप्रधानांचा अवमान केला आणि सातत्यानं करतच असतात. आता तर यांची मजल देशाच्या सर्वोच्च पदावरही चिखल उडविण्याइतपत पोहोचल्याचे दिसले. निमित्त झाले आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नुकत्याच महिला सुरक्षेविषयी व्यक्त केलेल्या भावनेचे. राष्ट्रपतींनी देशाच्या प्रमुख आणि एक महिला म्हणून देशातील तमाम महिलांच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केली. त्यासाठी त्यांनी काही घटनांचा दिला. राष्ट्रपतींनी व्यक्त केलेल्या भावनांमागची महत्त्वाची भूमिका ही महिला सुरक्षेविषयीची चिंता आहे. असे असताना, विरोधक अर्थात मविआचे नेते, प्रामुख्याने बोलघेवडे संजय राऊत यांनी देशातील सर्वोच्च संवैधानिक पदावर लांच्छन लावण्याचे काम केले. राष्ट्रपतींनी कधी बोलावे, कधी बोलू नये याबाबत मार्गदर्शन हे बोलघेवडे देशाच्या सर्वोच्च पदाला करत आहेत. ‘या घटनेवरच का त्या घटनेवर का नाही बोलल्या?’ असे अनेक प्रश्न हे लोकं राष्ट्रपतींच्या भूमिकेवर उपस्थित करताना दिसत आहेत. हेही वाचा : पन्नाशी पार केलेली बालबुद्धी
 
 
Uddhav Thackeray
 
पश्चिम बंगालची अत्याचारग्रस्त डॉक्टर आपली मुलगीच आहे. पण बदलापूरच्या चिमुकल्या मुली राष्ट्रपतींच्या कुणीच लागत नाही का, असा प्रश्न हे टिनपाट लोक करताना दिसत आहेत. त्याचवेळी संदेशखालीच्या घटनेचा उल्लेख का केला नाही, असा प्रश्न यांनी विचारला नाही. मुळात राष्ट्रपती मुर्मू यांनी आपल्या लेखात पश्चिम बंगालच्या ताज्या घटनेसह बदलापूरच्या चिमुकल्यांचा, दिल्लीच्या घटनेचा दाखला दिला आहे. मात्र, प्रातिनिधिक स्वरूपात उदाहरणंदेखील केवळ भाजपाशासित राज्यांचीच द्यावी, असा आग्रह विरोधकांचा आहे. घटना कितीही संवेदनशील असो, पण मविआच्या नेत्यांना मृतांच्या टाळूवरचे लोणी खाल्ल्याशिवाय समाधान वाटत नाही. प्रत्येक घटनेचं राजकारण खोटा ‘नॅरेटिव्ह’ पसरवून आपली राजकीय पोळी शेकणे यापलीकडे यांची बुद्धीच चालत नाही, हे या देशासाठी, समाजासाठी, माणुसकीसाठी लांच्छनास्पद आहे.
 
Uddhav Thackeray : ‘महिलांची सुरक्षा : आता अती झाले...’ अशा आशयाचं शीर्षक असलेल्या लेखातून राष्ट्रपतींनी एक महिला म्हणून आपली संतप्त भावना व्यक्त केली. महिलांच्या सुरक्षेला घेऊन चिंताही व्यक्त केली. त्याचबरोबर त्यांनी उपाययोजना करण्याचे, आत्मरक्षणाचे धडे देण्याचे आणि समाजातील विकृती दूर करण्याची गरज असल्याच्या सूचनाही दिल्या आहेत. त्यांनी केवळ पश्चिम बंगालमध्ये उपाययोजना करण्याची किंवा बदलाची गरज आहे, असे कुठेही म्हटलेले नसून देशातच अशा घटना घडत आहेत. त्यासाठी संपूर्ण देशात बदलाची, उपाययोजनांची गरज असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या लेखात म्हटलं आहे. पण विरोधकांना प्रत्येक गोष्टींचंच भांडवल सवय जडली आहे. खोटा नॅरेटिव्ह पसरवून समाजात दुही निर्माण करणे, आपली राजकीय पोळी शेकणे यासारखे अत्यंत असंवेदनशील असे सुप्त हेतू यामागे आहेत. यांना महिलांच्या सन्मानाशी, रक्षणाशी काहीही देणंघेणं नाही. हे संजय राऊत यांच्या कंगना राणावत, माजी खासदार नवनीत राणा, डॉ. स्वप्ना पाटकर यांच्याविषयी वापरलेली भाषा, डॉ. स्वप्ना पाटकरांसोबतचा संजय टेलिफोनिक संवाद ऐकला तर याला नेता किंवा एखाद्या वृत्तपत्राचा कार्यकारी संपादक हे पद शोभत नाही. गल्लीबोळातील हा एक विकृत, चिरकूट असा थिल्लर टपोरी असा माणूस असल्याचे सिद्ध होते आणि हीच व्यक्ती इतरांना शहाणपण शिकवते, महिलांच्या सन्मानाविषयी बोलते.
 
 
इतकंच काय, देशाच्या राष्ट्रपतींनासुद्धा आता सल्ले देताना दिसतो तेव्हा हसू आवरत नाही. Uddhav Thackeray  ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्यात महिलांवर अत्याचार झाले नाहीत? राज्यात बलात्काराच्या, महिलांच्या हत्येच्या घटना घडल्या नव्हत्या? घडल्या होत्या... नुसत्या घडल्याच नाही तर त्या वाढल्या होत्या. उद्धव ठाकरेंंच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात संजय राऊतांविरोधात डॉ. स्वप्ना पाटकरांनी तक्रार दिली होती. त्यांच्याच कार्यकाळात संजय राऊतांनी फोनवरून डॉ. स्वप्नांना अश्लील शिवीगाळ केली होती. उद्धव ठाकरेंकडून कारवाई करण्यात आली होती संजय राऊतांविरोधात तेव्हा? त्यावेळी तरुण, तरुणी, म्हातारे, अभिनेत्री, पोलिस, उद्योगपती, व्यापारी, नेव्ही ऑफिसर, खासदार, आमदार, मंत्री, केंद्रीय मंत्री असे कोणीही सुरक्षित नव्हते, कुण्या एका महिलेला मदत केली म्हणून जितेंद्र आव्हाडाने ‘जाऊ दे, मरू दे तिला. तू मध्ये पडू नको’चा सल्ला दिला होता, त्याचीही ध्वनिफीत समाजमाध्यमांवर आहे, मध्यप्रदेशात काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जमीनदोस्त केला होता आणि आता मात्र नकळत कुठल्या तरी नैसर्गिक आपत्ती किंवा तांत्रिक बाबींमुळे पुतळा कोसळला तर त्याचं भांडवल करताना हेच लोक दिसत आहेत. समाजाच्या भावना भडकावणे, जाती-जातीत, धर्मा-धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रकार हे संधिसाधू लोक वारंवार करत आहेत.
 
 
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी स्वतः मुख्यमंत्री असताना महिला सुरक्षेविषयी, राज्यातील कायदा व सुव्यवस्थेसाठी काहीही एक केलं नाही. २०२० ते २०२३ या काळात राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले होते. महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणांत वाढ झाली होती. स्वतःचं पाप आणि अपयश ठेवायचं झाकून आणि दुसर्‍याचं पाहायचं वाकून असा प्रकार या मविआच्या संधिसाधू, विकृत, समाजविघातक नेत्यांचा आहे. मणिपूरवर बडवणारे हे लोकं संदेशखालीवर बोलताना दिसले नाही. ‘आम्ही दोघं छोटेसे बहीण-भाऊ, उद्याला मोठाले होऊ...’वाले राहुल-प्रियांका या बहीण-भावाच्या जोडीने हाथरसला जाऊन प्रचंड ड्रामा केला. ‘लडकी हूं लड सकती हूं’चा नारा दिला. मात्र, त्याचवेळी संदेशखाली, कोलकाता रेप अ‍ॅण्ड मर्डर केस झाल्यावर तेथे जाणे तर सोडा; त्यावर ब्रदेखील उच्चारला नाही. लाडकी बहीण लागू केली तर ती रद्द करा म्हणून काँग्रेस एकदा नव्हे तर दोन-दोन वेळा उच्च न्यायालयात गेली आणि हेच लोक महिला सन्मान, महिला सुरक्षेचा कांगावा करत डांगोरा पिटत फिरत आहेत. नव्या संसदेच्या उद्घाटनाला बोलावले नाही तेव्हा हेच लोकं राष्ट्रपतींची प्रतिष्ठा, आदिवासी समाजाच्या सन्मानाचे गोडवे गात होते, पोवाडे म्हणत होते. याच आदिवासी समाजाविषयी आत्मीयता आहे, ना संविधानाचा, ना संवैधानिक पदांचा, ना संवैधानिक यंत्रणांचा किंवा महिलांचा आदर, सन्मान आहे. त्यामुळे हे लोकं राष्ट्रपतींसारख्या सर्वोच्च संवैधानिक पदाचा आणि एक आदिवासी महिला म्हणून त्यांचा सन्मान करतील, ही अपेक्षाच करणं चुकीची आहे.
 
- ९२७०३३३८८६