अन्नधान्य महागाई आणि ‘अमूल’ची भरारी

    दिनांक :01-Sep-2024
Total Views |
अर्थचक्र
- महेश देशपांडे
Economic inflation : गेल्या काही दिवसांमध्ये भारताचा मोठा व्यापारी भागीदार म्हणून अमेरिकेचा उदय झाला आहे. ही बातमी समोर येण्याच्या सुमारास अन्नधान्याच्या महागाईपासून दिलासा मिळण्याची कमी असल्याचे तथ्य समोर आले. या पृष्ठभूमीवर तेलबियांचे उत्पादन वाढवण्याला सरकारचे प्रोत्साहन असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, ‘अमूल’ हा जगातील सर्वात मजबूत फूड ब्रँड बनल्याची बातमी पुढे आली. चालू वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये (जानेवारी-जून) भारताचा सर्वोच्च व्यापार भागीदार म्हणून अमेरिकेचा उदय आला आहे. या कालावधीत देशाने चीनसोबत ४१.६ अब्ज डॉलरची तूट नोंदविल्याचे एका अहवालात म्हटले आहे. ‘रिसर्च इन्स्टिट्यूट ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह’ (जीटीआरआय) ने आपल्या अहवालात म्हटले आहे की, जानेवारी ते जून २०२४ दरम्यान देशाच्या व्यापारी मालाची निर्यात ५.४१ टक्क्यांनी वाढून २३०.५१ अब्ज डॉलर झाली. अहवालानुसार, ४१.६ अब्ज डॉलरची प्रचंड व्यापार तूट असलेल्या यादीत चीन अव्वल स्थानी आहे. जानेवारी-जून दरम्यान चीनला ८.५ अब्ज डॉलर निर्यात होती तर आयात ५०.१ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली. डेटाच्या विश्लेषणातून दिसून आले आहे की, भारत २३९ देशांना उत्पादनांची निर्यात करतो आणि यापैकी १२६ देशांनी निर्यातीत सकारात्मक वाढ दर्शविली आहे. भारताच्या एकूण निर्यातीमध्ये या देशांचा वाटा ७५.३ टक्के आहे. निर्यातीमध्ये वाढ असणार्‍या प्रमुख देशांमध्ये अमेरिका, अरब अमिराती (यूएई), नेदरलँड, सिंगापूर आणि चीन यांचा समावेश आहे. तथापि, इटली, बेल्जियम, नेपाळ आणि हाँगकाँग या ९८ देशांमधील निर्यातीत घट झाली आहे.
 
 
amul

 
अहवालानुसार अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा निर्यात भागीदार आहे. जानेवारी-जून २०२३ मध्ये अमेरिकेची निर्यात ३७.७ अब्ज डॉलर होती. ती या वर्षाच्या याच कालावधीमध्ये १०.५ टक्क्यांनी वाढून अब्ज डॉलर झाली आहे. या वर्षाच्या पहिल्या सहामाहीमध्ये चीन हा भारताचा सर्वात मोठा आयातदार राहिला. चीनची आयात ४६.२ अब्ज डॉलरवरून ५०.१ अब्ज डॉलर झाली. ‘जीटीआरआय’चे संस्थापक अजय श्रीवास्तव म्हणाले, चीन आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये भारताचा अव्वल व्यापार भागीदार राहिला; परंतु जानेवारी ते जून २०२४ या कालावधीत अमेरिका भारताचा सर्वात व्यापारी भागीदार बनला. चीन दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार म्हणून दुसर्‍या स्थानावर राहिला, एकूण व्यापार ५४.४ अब्ज डॉलरवरून ५८.६ अब्ज डॉलर जाला. त्यात ७.७ टक्क्यांनी वाढ झाली. लोहखनिज, फार्मास्युटिकल्स, मौल्यवान खडे, बासमती तांदूळ, रसायने आणि स्मार्टफोन यासारख्या क्षेत्रांमुळे व्यापारी मालाच्या निर्यातीत वाढ झाली. सेवांच्या आघाडीवर निर्यात ६.९ टक्क्यांनी वाढून अब्ज डॉलर झाली तर आयात ५.७९ टक्क्यांनी वाढून ९५ अब्ज डॉलर झाली.
 
 
दरम्यान, अर्थ मंत्रालयाने आपल्या मासिक Economic inflation आर्थिक आढाव्यात महागाई कमी होत असल्याचे म्हटले आहे, पण येत्या काही दिवसांमध्ये अन्नधान्य चलनवाढीपासून कोणताही दिलासा मिळणार नाही, असे रिझर्व्ह बँकेचे मत आहे. कौटुंबिक चलनवाढीच्या अपेक्षा वाढत आहेत. त्यामुळे अन्नधान्याच्या किमतींवरील दबावाचे परिणाम लक्षात घेऊन चलनविषयक धोरण ठेवावे लागेल. रिझर्व्ह बँकेने चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीचे इतिवृत्त प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार जुलैमध्ये खाद्यपदार्थांमध्ये वाढ झाली. बेस इफेक्टमुळे किरकोळ चलनवाढ दुसर्‍या तिमाहीमध्ये कमी होऊ शकते; परंतु तिसर्‍या तिमाहीमध्ये महागाई वाढू शकते. असमान हवामानामुळे अन्नधान्य महागाई वाढण्याचा धोका आहे. जागतिक तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत होत आहे. मोबाईलसेवेच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे महागाई वाढू शकते. देशांतर्गत चलनवाढीच्या अपेक्षांमध्ये वाढ झाली असून ग्राहकांचा आत्मविश्वास कमी झाला आहे. रिझर्व्ह बँकेच्या इतिवृत्तानुसार गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या मते आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीमध्ये महागाई कमी राहू शकते; परंतु अन्नधान्य महागाई कमी होताना दिसत नाही. देशांतर्गत चलनवाढीच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे चलनवाढीचा इतर घटकांवर परिणाम होऊ नये, म्हणून चलनविषयक धोरण अत्यंत सावध असावे लागेल. चांगला मान्सून आणि खरीप पिकांच्या पेरणीत वाढ, जलसाठ्यामध्ये वाढ आणि रबी हंगामात चांगले उत्पादन होण्याचा अंदाज यामुळे अन्नधान्य महागाई कमी होण्याची आशा त्यांनी व्यक्त केली.
 
 
या पृष्ठभूमीवर एक लक्षवेधी बातमी समोर आली. भारताचे तेलासाठी इतर देशांवरील कमी करण्यासाठी तेलबियांचे देशांतर्गत उत्पादन वाढविण्याचा सरकारचा विचार आहे. या योजनेंतर्गत स्वस्त आयातीमुळे देशांतर्गत किमती प्रभावित होऊ नयेत, यासाठी पिकांचे उत्पादन वाढवणे, लागवडीचे क्षेत्र वाढविणे आणि डायनॅमिक आयात शुल्क रचना लागू करण्याची योजना आहे. कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिलेल्या आश्वासनानुसार सरकार शेतकर्‍यांकडून मोहरी, सोयाबीन आणि भुईमूग यासारख्या तेलबिया किमान किमतीवर (एमएसपी) खात्रीपूर्वक खरेदी करण्याची व्यवस्था करत आहे. सूत्रांनी सांगितले की, कृषी मंत्रालयाने तेलबिया, विशेषत: मोहरी, भुईमूग, सोयाबीन, तीळ आणि नायगर बियाणांची उत्पादकता वाढवण्यासाठी २० राज्यांमधील ३४७ जिल्ह्यांमध्ये ६०० क्लस्टर्स निश्चित केले आहेत. एका अधिकार्‍याने सांगितले की, उच्च उत्पादन देणार्‍या बियाण्यांच्या जाती आणि बियाणे केंद्रे आणि साठवण सुविधांच्या स्थापनेद्वारे २०३० पर्यंत तेलबियांचे उत्पादन १३.५ क्विंटल/हेक्टरवरून २१.१ क्विंटल/हेक्टरपर्यंत वाढविण्याची आशा करतो. भारत हा वनस्पती तेलाचा जगातील दुसरा सर्वात मोठा ग्राहक आणि सर्वात मोठा आयातदार आहे. आपल्या वार्षिक वापराच्या सुमारे ५८ टक्के गरजा आयातीद्वारे पूर्ण केल्या जातात. पुढील तीन ते चार वर्षांमध्ये देशांतर्गत वापर सुमारे ३० दशलक्ष टनांपर्यंत पोहोचू शकतो, व्यापारी सूत्रांचा अंदाज आहे.
 
 
Economic inflation : आता एक खास बातमी. ‘अमूल’ने संपूर्ण जगात दबदबा निर्माण केला आहे. अमूल जगातील सर्वात मजबूत फूड ब्रँड बनला आहे. ‘अमूल’ ही खाद्य उत्पादने बनवणारी महाकाय कंपनी आहे. तिचे संपूर्ण देशभर वर्चस्व आहे. आता जगातही ‘अमूल’ने मान्यता मिळविली आहे. एका अहवालानुसार, ‘अमूल’ आता जगातील सर्वात मजबूत ब्रँड बनला आहे. ब्रँड फायनान्सच्या अहवालात याला एएए+ रेटिंग देण्यात आले आहे. कंपनीची ब्रँड व्हॅल्यूदेखील ३.३ अब्ज डॉलर झाली आहे. कंपनीने मागील वर्षी या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या ‘हर्षे’ला मागे टाकले. ‘अमूल’चा इतिहास जवळपास ७० वर्षांचा आहे. ब्रँड फायनान्सच्या ‘ग्लोबल फूड अँड ड्रिंक्स रिपोर्ट, २०२४’ नुसार ‘अमूल’ आता जगातील मजबूत फूड ब्रँड बनला आहे. ‘ब्रँड स्ट्रेंग्थ इंडेक्स’वर त्याचा स्कोअर १०० पैकी ९१ आहे. याशिवाय कंपनीला एएए+ रेटिंग मिळाले आहे. २०२३ च्या तुलनेत यावर्षी ‘अमूल’चे ब्रँड मूल्य ११ टक्क्यांनी वाढून ३.३ अब्ज डॉलर झाले आहे. ब्रँड मूल्याचा कंपनीच्या उलाढालीशी काहीही संबंध नाही. २०२२-२३ या आर्थिक वर्षात अमूलची विक्री १८.५ वाढून ७२ हजार कोटी रुपये झाली आहे. ब्रँड फायनान्स अहवालात ‘अमूल’ला ‘हर्षे’ सोबत एएए+ रेटिंग देण्यात आले आहे; पण ‘हर्षे’चा ब्रँड व्हॅल्यू ०.५ टक्क्यांनी घसरून ३.९ अब्ज डॉलर झाला आहे. त्यामुळे त्याला यंदाच्या यादीत दुसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले. दुग्ध व्यवसायात भारताच्या बाजारपेठेत ‘अमूल’चे मोठे नाव आहे. ‘अमूल’चा दूध ७५ टक्के, लोणी बाजारात ८५ टक्के तर चीज मार्केटमध्ये ६६ टक्के वाटा आहे.
 
 
Economic inflation : दरम्यान, ब्रँड फायनान्सच्या अहवालात ‘अमूल’ला एएए+ रेटिंग देण्यात आले आहे तर कंपनीची ब्रँड व्हॅल्यूदेखील ३.३ अब्ज डॉलर झाली आहे. कंपनीने जगभरात मोठा ठसा उमटवला आहे. अहवालात दिलेल्या माहितीनुसार ‘नेस्ले’ हा जगातील सर्वात मौल्यवान फूड ब्रँड म्हणून आला आहे. त्याचे बाजारमूल्य गेल्या वर्षीच्या तुलनेत ते सात टक्क्यांनी घसरले आहे. सध्या ते अंदाजे २०.८ अब्ज डॉलर आहे तर १२ अब्ज मुल्यांकनासह ‘लेज’ या यादीत दुसर्‍या स्थानावर आहे. नॉन-अल्कोहोलिक बेव्हरेज क्षेत्रात कोका-कोला पहिल्या क्रमांकावर तर पेप्सी दुसर्‍या क्रमांकावर आहे.
(लेखक आर्थिक घडामोडींचे अभ्यासक आहेत.)