बावळट पोरं!

    दिनांक :21-Sep-2024
Total Views |
मुंबई वार्तापत्र
- नागेश दाचेवार
येत्या महिनाभरात Assembly Elections विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने ‘महायुती’ आणि ‘महाविकास आघाडी’ तयारीला लागले आहेत. अशात आता एक नवी ‘परिवर्तन महाशक्ती आघाडी’ उदयास आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी, स्वराज्य संघटनेचे प्रमुख, माजी खासदार छत्रपती संभाजीराजे आणि प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी मिळून ही तिसरी आघाडी बनविली असून यात वंचित बहुजन आघाडीदेखील सहभागी होण्याची शक्यता आहे. हे चारही घटक, चारही व्यक्ती राज्यात त्यांच्या त्यांच्या भागात प्रभावी असल्याने विधानसभेच्या अनेक जागांवर प्रभावी ठरण्याची आहे. या आघाडीला राज्यात जनतेचा प्रतिसाद मिळाला तर महाविकास आघाडीला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. हा धोका लक्षात घेता उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी तिसरी आघाडी कायम सत्ताधार्‍यांच्या मदतीसाठी आणि विरोधकांच्या मतांमध्ये दुफळी माजविण्यासाठी तयार केली जाते, असे वक्तव्य केले. संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर तातडीने बच्चू कडूंनी ‘संजय बावळट पोरासारखं बोलू नये’ अशा शब्दात पलटवार करून, राऊतांचा किमान शब्दात कमाल अपमान केला आहे.
 
 
uddhav
 
संजयभाऊ तर बोलबच्चन आहेच. वायफळ बडबड करणे हा त्यांचा सवयीचा भाग आहे. कोणताही अभ्यास, माहिती नसताना सतत बरळत फिरणार्‍या संजयभाऊंना बच्चूभाऊंनी अभ्यास न करता एखाद्या बावळट पोरासारखं बोलू नये, असा सल्ला यावेळी दिला, तो म्हणावा लागेल. पण तरी राज्यातील सर्वात अशिक्षित, असंस्कृत, आचारशून्य, असभ्य, उद्धट, अशिष्टाचारी व्यक्तीकडून ही अपेक्षा करणे थोडी अतिशयोक्तीच म्हणता येईल.
 
 
तसे बच्चूभाऊंचा स्वभाव ‘एक घाव दोन तुकडे’वाला एकदम रोखठोक आहे. संजयभाऊ यावेळी ‘गलत हत्थे चढ गये है.’ कारण जशाच तसे, त्याच भाषेत उत्तर देणार्‍या बच्चूभाऊंशी खाजवण्याची चूक संजयभाऊंनी यावेळी आहे. बच्चू कडूच चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही भाषांत किंबहुना त्याहीपेक्षा कडक भाषेत प्रत्युत्तर देण्याची क्षमता ठेवतात. तसं राऊतांच्या खालच्या पातळीच्या भाषेची आणि अज्ञानी वृत्तीची बरोबरी कोणीही करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. पूर्वी देवेंद्र फडणवीसांनी वारंवार सांगितलं आहे, राऊतांच्या वक्तव्याला फार महत्त्व देऊ नका. त्यांना कोणी विचारत नाही. ते तर विरोधक झाले ते म्हणतीलच. पण आत्ता नुकतंच महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीदेखील, संजय राऊतांचं ऐकत जाऊ नका, फार महत्त्व देऊ नका, असे पत्रकारांना सांगितले. जेव्हा विधानसभा एकत्र लढण्याच्या आणि जागावाटपाची चर्चा सुरू असताना, नाना पटोले संजय राऊतांबद्दल असे विधान करत आहेत. याचा अर्थ आघाडीत त्यांची किती किंमत आहे किंवा त्यांच्या बोलण्याला किती किंमत आहे, याची प्रचीती येते. यावेळी वायफळ बरळणार्‍या संजयभाऊंना बच्चूभाऊंनी ट्रेलर दाखवला आहे. निवडणूक कशी लढावी याची माहिती संजय राऊतांना नाही. जेव्हा भाजपा-काँग्रेस हे दोन पक्ष लढत होते तेव्हा शिवसेना निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. त्यावेळी ती तिसरीच होती ना. मग पैशासाठी लढत होते, सत्ताधार्‍यांना मदत करायला लढत होते काय? असा सवाल करून गुगली टाकली. बच्चूभाऊंना जर पुन्हा प्रत्युत्तर देण्याच्या भानगडीत बावळट पोर पडलंच तर या बावळट पोराला ‘इट का जवाब पत्थर से’ मिळेल, यात शंका नाही.
 
 
युतीत सडले आणि आघाडीत?
एकीकडे Assembly Elections विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना उद्धव ठाकरे मात्र अस्वस्थ आहेत. काँग्रेसने केलेल्या अंतर्गत सर्व्हेमुळे ठाकरेंचं टेन्शन वाढलं आहे; नव्हे तर काँग्रेसने वाढवलं आहे. त्यामुळे ठाकरेंची अवस्था केविलवाणी झालेली दिसत आहे. या सर्व्हेनुसार मविआमधील घटक पक्षांपैकी काँग्रेसला सर्वाधिक जागा, त्यानंतर शरद पवार गटाला आणि उबाठा गटाला केवळ २५ ते ३० जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे उद्धव अस्वस्थ झाले असून काँग्रेस आणि शरद पवार गट ठाकरेंवर हावी झालेले आहेत. लोकसभेच्यावेळी केलेली मुजोरी आता ठाकरेंच्या अंगलट आल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्रिपदासाठी चाललेली उद्धव ठाकरेंची धडपड या सर्व्हेमुळे पार धुळीस मिळाल्याचं दिसत आहे. थेट दिल्ली गाठून त्यांनी, मला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा, अशी मागणी केली. एवढंच नाही तर महाविकास मित्रपक्षांनाही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी केली. परंतु, काँग्रेस आणि शरद पवार गटाने त्यांची ही मागणी परस्पर फेटाळून लावली आणि ज्याच्या जास्त जागा त्या पक्षाचा मुख्यमंत्री असं सांगून ठाकरेंना आल्या पावली माघारी पाठवलं.
 
 
Assembly Elections अशातच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचाच मुख्यमंत्री होणार, असं विधान करून पुन्हा उद्धव जखमेवर मीठ चोळले. अशातच जागावाटपाची चर्चा सुरू असताना आम्हीच मोठा भाऊ अशी भूमिका काँग्रेसने महाविकास आघाडीत मांडली. त्यामुळे ठाकरेंची अशी काय आग झाली की पुन्हा संजयभाऊंनी मोठा भाऊ, छोटा भाऊची खुमखुमी कोणाला असेल तर परिणाम पुढे दिसतील, अशा पद्धतीने आगपाखड केली. या सगळ्यामुळे उद्धव ठाकरेंची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली ‘ना इधर का ना उधर का’ अशी गत झाली आहे. अशातच आता मी माजी मुख्यमंत्री झालोय्, असं सांगणं हे ठाकरेंची एकप्रकारे हताश मानसिकतेतील हतबलताच दिसते. त्यामुळे न दिलेल्या शब्दावरून अकांडतांडव करून २५ वर्षे युतीत सडलो, असे सांगत, भाजपासोबत मग्रुरीने युती तोडणार्‍या ठाकरेंची अवस्था आघाडीत कशी दयनीय झाली आहे, हे सांगताच सर्वश्रुत झाले आहे. न दिलेल्या शब्दासाठी मुख्यमंत्रिपदाच्या लालसेने जर भाजपासोबत मुजोरी न करता तेव्हाच माघार घेतली असती तर आज ही वेळ आली नसती, एवढं मात्र निश्चित... 
 
- ९२७०३३३८८६